28 September 2021

ऑस्कर शिंडलर: नाझी जर्मनीतील देव माणूस

ऑस्कर शिंडलर: नाझी जर्मनीतील देव माणूस

                                                                    
                             ऑस्कर शिंडलर (१९०८ - १९७४)
                                  (Image Courtesy: https://en.wikipedia.org/wiki/Oskar_Schindler)                                                             
शीर्षक वाचून जरा विचित्र वाटणे हे स्वाभाविकच आहे, कारण दोन विरोधाभास असणाऱ्या गोष्टींना तुमच्यासमोर मांडतोय. 

दुसरे महायुद्ध लोटून साधारणपणे पाऊणशे वर्षे (७५) झाली. या युद्धाची भीषणता एवढी होती की त्यात सैनिकांबरोबरच अनेक निष्पाप माणसांचे बळी गेले. युरोपमध्ये तर वर्णश्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून ज्यू धर्मीय लोकांची झालेली कत्तल ही तर निर्दयतेचा व क्रूरतेचा कळस गाठणारी गोष्ट होती. पण या नाझींच्या पाशवी अत्याचारात ऑस्कर शिंडलर नावाचा देवमाणूस ज्यू लोकांच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला आणि त्याने हजारो ज्यू लोकांचे प्राण वाचवले. हे महायुद्ध संपल्यानंतर, या वाचलेल्या ज्यू लोकांनी आपले इस्रायल नावाचे स्वतःचे नवीन राष्ट्र उभारले. त्या वाचलेल्या लोकांच्या पिढ्या अजूनही इस्रायल मध्ये आहेत त्यांना Schindler Jews (जर्मन भाषांतर- Schindler Juden शिंडलर जुडेन) असे म्हटले जाते. 

तर आपण पाहूया हा ऑस्कर शिंडलर नेमका कोण होता? त्याने हे कसे आणि कशासाठी केले? याचा मागोवा घेण्यासाठी काळाच्या थोडेसे मागे जाऊया, दुसऱ्या महायुद्धात !!

साल/ वर्ष :- १९३९

घटना :- नाझी जर्मनीचे पोलंडवर आक्रमण आणि पोलंडवर पूर्ण कब्जा

ऑस्कर शिंडलर हा त्यावेळी जर्मनीतील एक प्रथितयश उद्योगपती आणि नाझी पक्षाचा सदस्य होता. तो स्वतः जरी जर्मन असला तरी हिटलरच्या ज्यू विरोधी कारवाया त्याला मुळीच पसंत नव्हत्या. त्याची नाझी वर्तुळातील उच्चभ्रू व्यक्तींमध्ये ऊठबस होती आणि त्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते. ज्यावेळेस जर्मनीने पोलंड ताब्यात घेतले त्यावेळी ऑस्कर शिंडलर हा उद्योगधंद्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी पोलंडमधील क्रॅकोव्ह नावाच्या शहरात आला. तेथे त्याने ॲल्युमिनियमच्या धातूपासून बनणाऱ्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी फॅक्टरी सुरू केली. यासाठी लागणारे भांडवल तर त्याच्याजवळ होतेच, पण कुशल कामगारांचा सुद्धा प्रश्न होता. त्यासाठी त्याला पराभूत पोलंडमधील ज्यू लोक हे स्वस्तात कामगार म्हणून मिळू लागले. वास्तविक पाहता ज्यू लोक हे पहिल्यापासून व्यापार-उद्योगात कुशल, मेहनती आणि प्रामाणिक होते. ही गोष्ट शिंडलरच्या चांगलेच पथ्यावर पडली. त्याच्या कारखान्याचे नाव "जर्मन इनेमलवेअर फॅक्टरी" होते आणि तोही चांगले जाणून होता की जर या उद्योगात त्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला मोठ्या पदावरच्या नाझी जर्मन अधिकाऱ्यांना खूष करावे लागणार होते. मग  शिंडलरने नाझी अधिकाऱ्यांना लाच देणे चालू केले यामध्ये त्यांना तो पैसे, उंची मद्ये, महागड्या भेटवस्तू, घड्याळे इ. त्यांना द्यायचा व त्या बदल्यात हे अधिकारी त्याला फॅक्टरी चालविण्याची आणि नवीन ज्यू कामगारांना भरती करण्याची मुभा द्यायचे. 

हे सगळे चालू असताना दुसरीकडे ज्यू लोकांच्या अत्याचारासाठी नाझींनी अनेक छळछावण्या (Concentration Camps) पोलंडमध्ये उभारल्या. येथे कोणाच्याही जीवाची शाश्वती नव्हती. नाझी अधिकाऱ्यांच्या वेडसर लहरीपायी  अनेक निष्पाप लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांना जीव गमवावा लागला. त्यातल्या त्यात जे ज्यू लोक अंगापिंडाने धडधाकट होते, त्यांना नाझी सैनिक कष्टाच्या कामांसाठी मजुरासारखे राबवत असत. दिवस उजाडल्यापासून प्रत्येक ज्यू आपला जीव मुठीत धरून असायचा. दिवस सरला की तो दिवस म्हणजे आयुष्यात मिळालेला एक बोनसच असायचा. सभोवताली घडत असलेल्या घटनांमुळे शिंडलरच्या मनात माणुसकी जागी झाली आणि त्याने ठरवले कि शक्य होईल तेवढ्या ज्यू लोकांना आपण वाचवायचे, बस. तोपर्यंत त्याच्या फॅक्टरीमध्ये बरेचसे लोक काम करत होते. साधारणपणे 1942 साली, जेव्हा ज्यूंची  मोठ्या प्रमाणात धरपकड केली जात होती, त्या वेळेस शिंडलरच्या फॅक्टरीतील ज्यू कामगारांना सुद्धा पकडले. हे जेव्हा शिंडलरला समजले; तेव्हा त्या लोकांना वाचवण्यासाठी शिंडलर ने भ्रष्ट नाझी अधिकाऱ्यांना लाच देऊन, त्याच्या उच्चभ्रू नाझी वर्तुळातील मित्रांच्या ओळखी सांगून, युक्तिवाद करून त्याने त्याच्या कामगारांना सोडवले. या घटनेच्या एक-दीड वर्षानंतर परत ज्यू लोकांची धरपकड करून त्यांची छळ छावण्यात रवानगी करण्यात आली. पण या वेळेस सुद्धा शिंडलरने शिताफीने आपली फॅक्टरी दुसऱ्या ठिकाणी हलवली व आपली फॅक्टरी युद्धासाठी लागणाऱ्या गोष्टी बनवेल असे मुद्दामच नाझी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्याने १२०० कामगारांची एक यादी तयार केली व नाझी अधिकाऱ्यांना हे १२०० लोकं आपापल्या कामात कुशल आहेत व ते युद्धाचे सामान/वस्तू करायला मदत करतील असे नानाविध प्रकारचे युक्तिवाद करून त्यांना छळछावण्यात न जाऊ द्यावे असे कबूल करवून घेतले. त्यानंतर त्याने या सर्व ज्यू लोकांना आपल्या फॅक्टरीमध्ये आश्रय दिला. फॅक्टरी मध्ये त्याने ज्या ज्या वस्तू बनविल्या त्या मुद्दाम चुकीच्या (सदोष) बनविल्या. नाझी अधिकाऱ्यांकडून याबाबत विचारणा झाली असता त्याने नानाविध कारणे देऊन (जसे की मशीन किंवा यंत्रामध्ये बिघाड आहे, कच्च्या मालाची प्रत चांगली नाही) वेळ मारून नेली.


यथावकाश युद्ध संपले. जर्मनीने शरणागती पत्करली. दोस्त राष्ट्रांच्या फौजा जर्मनीने काबीज केलेल्या प्रदेशात येऊ लागल्या. रशियन सैनिकांच्या फौजा हळूहळू ऑस्कर शिंडलरच्या कारखान्या जवळ येऊ लागल्या त्यावेळेस ऑस्कर शिंडलरने साश्रुपूर्ण डोळ्यांनी त्या १२०० कामगारांचा निरोप घेतला आणि म्हणाला, "आजपासून तुम्ही स्वतंत्र आहात. जे घडले ते सर्वांसाठी खूप वाईट होते. याचा सूड घेण्याचा प्रयत्न करू नका."


शिंडलरने तयार केलेल्या १२०० ज्यू लोकांच्या यादीला Schindler's List असे म्हटले जाते. यावर हॉलिवूड मध्ये एक सर्वोत्कृष्ट सिनेमा सुद्धा आहे. जो विख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी बनवला होता. युद्धाची भीषणता, भयानकता काय असते त्याचे मानवी मनावर काय परिणाम होतात आणि त्यातूनही ऑस्कर शिंडलर सारखी व्यक्ती निष्पाप, हतबल, दुर्बल पराजित झालेल्या लोकांना कसे वाचवतो, हे पहायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी हा सिनेमा जरूर बघावा. तब्बल तीन-साडेतीन (जवळपास १९० मिनिटे)  तासाचा हा सिनेमा आहे. पण सर्वच गोष्टी अफलातून आणि अतिशय परिणामकारकरित्या सादर केलेल्या आहेत. या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सिनेमा कृष्ण-धवल (Black and White) आहे. १९९३ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यावर्षीच्या बहुतेक सर्व ऑस्करच्या बाहुल्या यानेच पटकावल्या. तब्बल बारा नामांकने आणि सात पुरस्कार. 


                                                 (Image Courtesy: Google)  

जाता जाता एवढेच सांगेन जगातील प्रत्येक प्रमुख धर्मामध्ये हेच म्हटले आहे की, “जर कोणी एखाद्या निष्पाप माणसाची हत्या करेल, तर त्याचे हे कृत्य म्हणजे त्याने समस्त मानवजातीची हत्या करण्यासारखे असेल, आणि जर कोणी एखाद्या निष्पाप माणसाचा जीव वाचवेल, तर त्याने समस्त मानवजातीला वाचविण्यासारखे असेल”. यावरून आपण कल्पना करू शकतो कि ऑस्कर शिंडलरने केलेले कार्य मानवतेच्या दृष्टीने किती उदात्त आणि उत्तुंग होते.


इम्रान तांबोळी
वारणानगर (कोल्हापूर)